गडचिरोली:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती दिली. वाहनाचा वापर, प्रचार सभा, लावूडस्पिकर, राजकीय जाहिराती व अनुषंगीक बाबींना राजकीय पक्षाने घ्यावयाच्या पूर्व परवानग्या तसेच निवडणूक खर्चाच्या नोंदी, काय करावे व काय करू नये याबाबत त्यांनी राजकीय पक्षाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना नियमांची माहिती दिली.
बँकर्सनी संदिग्ध व्यवहाराची माहिती कळवावी
निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना बँकेचे नवीन खाते त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून त्याच दिवशी तात्काळ सुरू करून द्यावे. तसेच बँकेत जमा व खर्चाच्या संदिग्ध व्यवहाराबाबत विशेषत: १० लाखावरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तत्काळ अवगत करावे. बँकेची रकम वहन करणाऱ्या वाहनावर विहित क्युआर कोड लावावा तसेच जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकर्सच्या सभेत दिल्या.
प्रिटींग प्रेसला सूचना
राजकीय उमेदवारांचे प्रचार साहित्य छापतांना प्रिटींग प्रेस मालकांनी निवडणूक विभागाकडून पूर्व परवानगी घ्यावी. छापील साहित्यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव असावे तसेच उमेदवारांकडून छपाईसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत, प्रकाशीत प्रतीची संख्या याबाबत निवडणूक खर्च समितीस वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी प्रिंटींग प्रेसच्या प्रतिनिधींना दिल्या.
नामकरणाची मागणी मंजूर केल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार
गडचिरोली:-गडचिरोलीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके करण्यात यावे ती मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी शासन स्तरावर केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) गडचिरोलीचे नामकरण क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी ) गडचिरोली, जि. गडचिरोली करण्यात आले आहे . या प्रशिक्षण संस्थेचा नामकरण सोहळा दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
नामकरणाची मागणी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना .एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांचे आभार मानले आहे.
Gadchiroli News: गत तीन वर्षांत प्रथमच रानटी हत्तींच्या कळपाने गडचिरोली शहराची सीमा रविवारी ओलांडली. दुपारी मसली परिसरात व सायंकाळी वाकडी आणि सेमाना देवस्थानच्या मध्यवर्ती जंगलात हा कळप दिसून आला. त्यामुळे वनविभाग आणि हुल्ला टीमला चामोर्शी मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवावी लागली.
मागील आठ दिवसांपासून या रानटी हत्तींचा कळप पोर्ला वनक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्रात वावरत होता. या काळात नवरगाव, कोडना, साखरा, गोगाव, महादवाडी, कुऱ्हाडी या भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शनिवारी या कळपाने गोगावलगतच्या नागोबा देवस्थान परिसरात पीक तुडवले. त्यानंतर रात्री खरपुंडी गावाजवळची कठाणी नदी ओलांडून सालईटोला गावाच्या बाजूने माडेतुकूम परिसरातून गडचिरोली- धानोरा मार्ग ओलांडला.
टेकडीवरील हनुमान मंदिर परिसरातून हा कळप पोटेगाव मार्गाच्या दिशेने मसली गावात गेला. रविवारी दुपारपर्यंत हा कळप याच भागात होता, आणि सायंकाळी त्यांनी सेमाना उद्यान ते वाकडी फाट्याच्या मधल्या जंगलातून चामोर्शी मार्ग ओलांडला. हत्तींचा रोख मुडझा गावाच्या दिशेने होता. वनविभागाच्या पथकाने हत्तींच्या हालचाली पाहून वाहतूक बंद केली आणि नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सतर्कतेची सूचना दिली.
गडचिरोली
स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे एकोणचाळीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी श्री. ऊकंडराव नारायण राऊत यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "अर्धांगिनी" या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
श्री. ऊकंडराव नारायण राऊत हे पोर्ला (जिल्हा- गडचिरोली) येथील रहिवासी असून ते जिल्हा परिषद गडचिरोली येथून केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना भजनाची व गाण्याची विशेष आवड असून नवोदित कवी आहेत. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गीते तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या एकोणचाळीसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. पी. एस. बनसोडे, पुनाजी कोटरंगे, गजानन गेडाम, अजय राऊत, गणेश रामदास निकम, संगीता ठलाल, तुळशीराम उंदीरवाडे, जयराम धोंगडे, रेखा दिक्षित, प्रिती ईश्वर चहांदे, वामनदादा गेडाम, सोनाली रायपुरे - सहारे, डॉ. मंदा पडवेकर, लता शेंद्रे, मुरलीधर खोटेले, रोहिणी पराडकर, वंदना मडावी, वंदना सोरते, सुरेश गेडाम, यामिनी मडावी, कृष्णा कुंभारे, सुभाष धाराशिवकर, सुनिल चडगुलवार, सिध्दार्थ गोवर्धन, सोनू अलाम, विलास टिकले, ऊकंडराव नारायण राऊत, पुरुषोत्तम दहिकर, चरणदास वैरागडे, शैला चिमड्यालवार, ज्योत्स्ना बंसोड, केवळराम बगमारे, खुशाल म्हशाखेत्री, पी.डी.काटकर,संगीता रामटेके इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
जारावंडी परिसरातील अत्यंत ज्वलंत समस्या घेऊन व मागण्यान्ची पूर्तता व्हावे.या भावनेने मा. मुकेशभाऊ कावळे ग्रा. पं. सदस्य जारावंडी यांच्या पुढाकारातून आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे विवीध मागन्या साठी निवेदन सादर करण्यात आले व काही ग्राम पंचायत स्थरावरील समस्यांसाठी CEO गडचिरोली याना सुद्धा निवेदन देण्यात आल
ग्रामपंचायत जाराववंडी तर्फे आठवडी बाजार भरतो त्या बाजारात पावसाळ्याच्या वेळेस गड्डे पडून त्या खड्ड्यामध्ये पाणीच भरतो आणि चिखलाचे पण साम्राज्य असते त्यामुळे ग्राहकांना आणि दुकानदारांना नाहक त्रास होत आहे. जवळपास 15 ते 20 गावांचा त्या ठिकाणी आठवडी बाजार भरत असून त्यावेळेस दुकानदारांना ग्राहक मिळत नसल्यामुळे दुकानदार नाराजी व्यक्त करत आहेत .
हे निवेदन सादर करताना जारावंडी परिसरातील प्रतिष्ठित नागरीक जिल्हा कार्यालयात उपस्थित होते त्यात प्रामुख्याने मान. जयेंद्रजी पवार, अध्यक्ष आ.वि.का. संस्था जारावंडी,संतोष मडावी उपसभापती (आ.वि.का. संस्था) हरिदासजी टेकाम माजी सरपंच, दयाराम सिडाम,गुरुदास टींगुसले, रेश्मा सुरपाम,शीतल शेडमाके,मालता मोहूर्ले सह जारावंडी तिल बहुसंख्येने महिला
उपस्थित होते.
दिं.२५ सप्टेंबर २०२४
गडचिरोली : विदर्भातील आणि संपूर्ण राज्यातील भाविकांची आस्था असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा बुधवारी मार्कंडा येथे आढावा घेण्यात आला. या कामाला गती देण्यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक यांनी हे काम पुरातत्व विभागाच्या नियमावलीप्रमाणेच करावे लागत असल्याने वेळ लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यावर या कामाला गती देण्यासाठी कुशल कारागिरांची संख्या वाढविण्याची सूचना मा.खा.नेते यांनी केली.
मार्कंडा देवस्थानाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत मलिक यांनी कार्यपद्धती सांगितली. इतर कोणत्याही कामासाठी मनु्ष्यबळ आणि मशिनरी वाढवून ते काम लवकर करता येते, पण हे पुरातन नक्षीकाम असल्याने दगडांवर कोरीव काम करून ते तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित करण्यासाठी याची खात्री करूनच करावे लागत आहे. या नक्षीकामासाठी मोजकेच कारागीर असल्याने वेळ लागत असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम थोडे उशिरा होत असले तरी चांगल्या दर्जाचे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यावर नक्षीकाम करणाऱ्या कारागिरांची संख्या वाढविण्याची सूचना अशोक नेते यांनी केली.
या आढावा बैठकीपूर्वी सर्वांनी कामाची पाहणी केली. दगडांवर नक्षीकाम करण्यासाठी असलेले कारागिर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचे आहेत. त्यांच्या कामाची नेते यांनी प्रशंसा करत कामाला गती देण्यास सांगितले.
यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, नगरसेवक तथा सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, देवस्थानचे सचिव मृत्युंजय गायकवाड, आदिवासी नेते रेवनाथ कुसराम, भाजपचे युवा नेते नरेश अल्लसावार, अमोल आईंचवार, सेविकांत आभारे, देवस्थानचे सहकारी शेंडे, पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एप्रिल महिन्यात पुन्हा सुरू झाले काम
गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेले हे मंदिर जीर्णोद्धाराचे काम बऱ्याच दिवसांपासून अर्धवट स्थितीत थांबलेले होते. तत्कालीन खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हे काम पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया केली. त्याचवेळी मंदिराच्या कामाला सुरूवात करण्यावरून हरणघाटचे मुरलीधर महाराज व नागरिक उपोषण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. मात्र अशोक नेते व तत्कालीन जिल्हाधिकारी संजय मिना यांनी हे काम पुन्हा सुरू करण्यासंबंधी प्रक्रिया झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर मुरलीधर महाराज मंदिराच्या आवारातच अन्नत्याग करण्यासाठी बसले होते. पण अशोक नेते यांनी एप्रिल महिन्यात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केल्याने सर्वांना दिलासा मिळाला. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने त्याला गती देण्यासाठी माजी खा.अशोक नेते यांनी ही बैठक घेतली
गडचिरोली:
स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे अडतिसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी श्री. सुनिल चडगुलवार यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या "वेदना " या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
श्री. सुनिल चडगुलवार हे गडचिरोली येथील रहिवासी असून ते प्रसिद्ध नाट्य कलावंत, नाटककार, दिग्दर्शक व नवोदित कवी आहेत. त्यांच्या 'राजीनामा' या एकांकिकेला अनेक पारितोषिके प्राप्त झालेली असून नाट्यश्रीच्या एकपात्री अभिनय स्पर्धेत सलग तीन वर्षे त्यांनी पुरस्कार पटकावले आहेत. स्थानिक राजवी प्राडक्शनचे संचालक असून गडचिरोली तालुका झाडीपट्टी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. नुकतेच कविता लेखनास त्यांनी प्रारंभ केला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या अडतिसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. पी.एस. बनसोडे, तुळशीराम उंदीरवाडे, स्वप्नील बांबोळे, जयराम धोंगडे, अजय राऊत, गणेश रामदास निकम, संगीता ठलाल, सुभाष धाराशिवकर, रोहिणी पराडकर, सोनाली रायपुरे, पुनाजी कोटरंगे, वंदना सोरते, प्रभाकर दुर्गे, ज्योत्स्ना बन्सोड, मुर्लीधर खोटेले, जयराम धोंगडे, यामिनी मडावी, विलास जेंगठे, राजेंद्र यादवराव सोनटक्के, रेखा दिक्षित, लता शेंद्रे, शैला चिमड्यालवार, उकंडराव नारायण राऊत, नरेंद्र गुंडेली, ज्योती म्हस्के, वामनदादा गेडाम, प्रिती ईश्वर चहांदे, मधुकर दुफारे, सुनिल चडगुलवार, केवळराम बगमारे, खुशाल म्हशाखेत्री, सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
गडचिरोली / प्रतिनिधी दि. ६/९/२०२४:- येथील प्रतिष्ठित, लाचार होऊन पैशासाठी कामं करणाऱ्या मुकुंद जोशी यांच्या गटाला विना टेंडर दिलेल्या सर्व कामांची जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे, विभागीय युवा अध्यक्ष निरज कांबळे , महिला प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई पाटील , महासचिव ईश्वर मोरे , कार्याध्यक्ष एच.बी उराडे , गडचिरोली विधानसभा प्रमुख पुरुषोत्तम सलामे, यांनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , जिल्हा प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे . .
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मुकुंद जोशी यांनी.... स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून SNCU अंतर्गत २०१२ ते २०१८ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यस्त्रोतांने कर्मचारी पुरवठा करण्याचे काम केलेले आहे. तसेच गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात २०१९ पासून २०२४ पर्यंत काम सुरू आहे. यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ, ईएसआयसी आणि करारानुसार बॅंक खात्यात पैसे जमा केले नाही. नियमानुसार ई टेंडर प्रक्रिया करणे आवश्यक होते . परंतु केवळ कोटेशनवर लाखो रुपयांचे कंत्राट देण्याचे काम संबंधित प्रशासकिय अधिकारी आणि लिपीक यांनी केले आले. संबंधित व्यक्तीला धोबीचेही कंत्राट विना टेंडर दिले आहे . प्रत्यक्षात काम न करता जिल्हा सामान्य रुग्णालयातील तसेच महिला व बाल रुग्णालयातील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकून स्वताच्या स्वार्थासाठी लाखो रुपयांची उचल करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला आहे . विना टेंडर सतत काम देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित लिपीकावर उचित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य संचालक, आरोग्य सचिव , जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली , जिल्हा पोलिस अधीक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा संचालनालय नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे केली आहे. अशी माहिती गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सैनिक समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
उप मुख्यमंत्री अजित पवार आज गडचिरोली जिल्ह्यात
गडचिरोली / दि.5: उप मुख्यमंत्री अजित पवार 06 सप्टेंबर 2024 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील.
दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहेरी येथे आगमन. सकाळी 11.15 वा. राजे धर्मवीर शाळा, रेड्डी कॉम्पलेक्स, अहेरी रोड, नागेपल्ली येथे रक्षाबंधन कार्यकम. सकाळी 11.45 वा. सावरकर चौक, आलापल्ली येथे आदिवासी बंधू-भगिनींमार्फत पारंपारिक नृत्य कार्यक्रम सादरीकरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वा. वन विभागाचे मैदान, आलापल्ली येथे जनसन्मान यात्रा- शेतकरी व लाडक्या बहिणींशी संवाद. दुपारी 2.15 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव. दुपारी 3.20 वाजता नागपूरकडे प्रयाण.
गडचिरोली/ दि.5: जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेने विकास कामांसाठी मंजूर केलेला निधी तत्परतेने खर्च करावा तसेच दुर्गम भागात विजेची समस्या निकाली काढण्यासाठी विद्युत विभागाने जिल्हा नियोजनच्या निधीतून किमान 100 दुर्गम गावात सौर विद्युत यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन अंतर्गत 2023-24 च्या खर्चाचा व 2024-25 च्या विकास कामांचा आढावा श्री दैने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय सचीव विद्याधर महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रमेश यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दैने यांनी पुढे सांगितले की गडचिरोली हा जंगलव्याप्त आणि दुर्गम भाग असल्याने येथे विजपुरवठाच्या अनेक समस्या आहेत. वीज उपलब्ध करण्यासाठी वीद्युत निर्मिती संच उभारणे, दुर्गम भागात दुरवर वीजपुरवठ्याची लाईन टाकणे, बांधकाम करणे, वनक्षेत्राकरिता परवानग्या व इतर अडचणी सोडवणे, त्याची देखभाल दुरूस्तीसाठी कायम मनुष्यबळ उपलब्ध ठेवणे, सार्वजनिक वीज वापरासाठी रकमेची तजवीज करणे या सर्व बाबींवर सौर विद्युत यंत्रणा हा सर्वोत्तम पर्याय असून त्याच्या वापरारतून ज्या दुर्गम भागात अद्यापही वीज पोहचली नाही किंवा वीजपूरठ्यासाठी नेहमीच समस्या उदभवतात त्या सोडवण्यासाठी सौर यंत्रणा टप्प्याटप्प्यात बसवून दुर्गम भागातील वीजपुरवठ्याचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पालकमंत्री यांचे सचिव विद्याधर महाले यांनी जिल्ह्यातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री यांची सदैव आग्रही भूमिका असल्याचे त्यासाठी पालकमंत्र्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजनच्या निधीतून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधांचे निर्माण करणे, प्रत्येक शाळेत सिसिटीव्ही कॅमेरे लावणे, टेक्नोसेवी व डिजिटल शाळा तयार करणे, शालेय क्रिडांगणाचा विकास करणे, कौशल्य विकास विभागाने रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना सक्षम करणे, जिल्ह्यात पर्यटनला चालना देण्यासाठी वन विभागाने विश्रामगृह बांधून पर्यटकांच्या राहण्याची सोय करणे आदी सूचना दिल्या. एटापल्ली वनविभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन रस्ते बांधकामासंबंधी तक्रारी न करता नागरिकांची सोय लक्षात घेवून समोपचाराने मार्ग काढण्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नरसिंहपल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी इमारत बांधकामाची आवश्यकता असल्याचे सांगून निवासस्थानाऐवजी दवाखाना बांधण्याकरिता प्राधाण्याने निधी वाढवून देण्याची विनंती केली.
यावेळी कृषी, आरोग्य, वन, जलसंधारण, शिक्षण, नगरविकास, महिला व बालकल्याण, आदी विविध यंत्रणेच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत 340 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. हा सर्व निधी 100 टक्के खर्च करण्यात आला आहे. तर 2024-25 साठी 406 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून 135 कोटी 32 लाख रुपये निधी बीडीएस प्रणालीवर उपलब्ध झाल्याचे व त्यातील 54 कोटी 75 लाख निधी 31 ऑगस्टपर्यंत यंत्रणांना वितरीत केला असल्याचे आणि त्यापैकी 19 कोटी 66 लाख रुपये निधी खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी सादर केली.
बैठकीला जिल्ह्यातील सर्व संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली/दिनांक,5: जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अतर्गत सन २०२३ मध्ये पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करून पुर्ण माहिती असलेल्या एकूण २५१ उमेदवारांचा अंतिम जेष्ठता सुची तयार करून जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली होती. या कार्यालयाचे पत्र दिनांक २२ ऑगस्ट २०२४ राजा प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सूचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यतच्या अनुकंपाधारक उमेदवारांचे दस्ताऐवजांची पडताळणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार याव्दारे आवाहन करण्यात येते की. दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी ठिक सकाळी ११.०० वाजता वर्ग-३ व वर्ग-४ च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती संबंधाने समुपदेशन घेण्यात येणार आहे. तरी प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधिन सुचीतील अनुक्रमांक ०१ ते १५० पर्यंतच्या उमेदवारांनी मुळ दस्ताऐवजांसह विर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे समुपदेशानाकरीता उपस्थित राहावे.
प्रतिक्षाधिन सुचीतील अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियाव्दारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येत असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमीषाला / भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.
गडचिरोली/ दिनांक, 03 :- गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. दिनांक 02/09/2024 रोजी बैल पोळा, तान्हा पोळा तसेच येत्या काही दिवसात असलेला गणेशोत्सव व इतर महत्वाचे सण शांततेत पार पाडुन उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये व पोस्टे हद्दीत अवैधरित्या चालणाया धंद्यांवर आळा बसविण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 02/09/2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे अहेरी येथील प्रभारी अधिकारी पोनि. स्वप्नील ईज्जपवार हे पोस्टेच्या स्टाफसह हद्दीतील अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना मौजा कोलपल्ली तालुका अहेरी येथील आरोपी नामे 1) देवाजी निला सिडाम वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तह. अहेरी, जि. गडचिरोली हे त्यांच्या राहते घरुन देशी विदेशी दारुची अवैध विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन त्यांचे राहत्या घरी धाड टाकली असता, देशी विदेशी दारुसह एकुण 9,35,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यामध्ये, रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या 90 मिली मापाच्या एकुण 10,000 सिलबंद निपा किंमत 8,00,000/- रुपये, किंगफिशर स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या एकुण 80 नग बॉटल किंमत 24,000/- रुपये, हेवड्र्स 5000 स्टॉग बिअर कंपनीच्या 650 मिली मापाच्या 230 नग सिलबंद बॉटल किंमत 57,500/- रुपये, ऑफिसर चॉईस कंपनीच्या 1000 मिली मापाच्या 54 नग सिलबंद बंपर किंमत 54,000/- रुपये असा एकुण 9,35,500/- (अक्षरी नऊ लाख पसतीस हजार पाचशे रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोउपनि. सागर माने, पोस्टे अहेरी यांचे लेखी फिर्यादीवरुन पाहिजे असलेले आरोपी नामे 1) देवाजी निला सिडाम, वय 34 वर्षे, 2) दिलीप रामा पोरतेट, वय 28 वर्षे, 3) संपत पोच्चा आईलवार, वय 38 वर्षे, सर्व रा. कोलपल्ली तालुका अहेरी, जि. गडचिरोली यांचे विरुध्द पोस्टे अहेरी येथे अप क्र. 258/2024 कलम 65 (ई), 83 महा. दा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे अहेरी पोनि. स्वप्नील ईज्जपवार यांचे नेतृत्वात, सपोनि. मंगेश वळवी, पोउपनि. सागर माने, पोउपनि. अतुल तराळे, पोहवा/1850 निलकंठ पेंदाम, नापोअं/5337 हेमराज वाघाडे, पोअं/5373 शंकर दहीफळे, मपोअं/8064 राणी कुसनाके, चापोहवा/2796 दादाराव सिडाम यांनी पार पाडली.
गडचिरोली दि.३: जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज व निवेदन सादर करण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेसाठी तळमजल्यावर दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून सदर कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या लिफ्ट मशीनचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होईपर्यंत दिव्यांग अभ्यागत कक्ष तळमजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या समोरील कक्षात स्थापन करण्यात आला असून या कक्षाचे नोडल अधिकारी म्हणुन नायब तहसिलदार अमोल गव्हारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
गडचिरोली/ दि.02: अल्पसंख्यांक विकास विभाग अंतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२०२५ परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेच्या अटी व शर्ती- विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदयातील व महाराष्ट्र राज्याया रहिवासी असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाखापेक्षा जास्त नसावे (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रीत वार्षीक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडीलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडीलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. पीएचडीसाठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षापेक्षा कमी नसावा. पदव्युत्तर पदवीसाठी ३ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो. तथापि कोणत्याही परिस्थितीत २ वर्षापेक्षा कमी नसावा. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल. एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटूंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतीम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटूंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा, परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत (QS World University Rank) २०० च्या आत असावी. शासनाने सर्व विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषामध्ये समानता आणण्या करीता सर्वकष धोरण ठरविले आहे. त्यामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वकष नियमावलीचे सर्व विभागांनी पालन करणे अपेक्षित असल्याने नियोजन विभागाने घेतलेला शासन निर्णय अंतिम असेल. त्यानुषंगाने नमूद करण्यात येते की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बांधकामे) कार्यासनामार्फत दि.३०.१०.२०२३ रोजी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्या संदर्भात दि.९.११.२०२३ रोजी शासन शुध्दीपत्रक निर्गमित केलेले आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांस पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणीक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे. शासन निर्णय क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२३.११.२०२३ मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन पुरकपत्र क्र. अविवि २०१९/प्र.क्र.२११/का-६, दि.२०.६.२०२४मधील अटी शर्ती लागू राहतील. शासन निर्णय क्र.सान्यावि-२०२४/प्र.क्र.७७/बांधकामे, दि.२५.७.२०२४ मधील अटी शर्ती लागू राहतील. अटी व शर्ती ह्या सविस्तर जाहिराती प्रमाणे व शासन निर्णयानुसार लागू राहतील. सदरील वेबसाईट वरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. ०६/०९/२०२४ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा. ऑनलाईन पोर्टल सुरु झाल्यास त्याबाबत माहिती देण्यात येईल. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी.
योजनेतील लाभाचे स्वरुप - परदेशातील शैक्षणिक संस्थेने Offer Letter मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गानी Economy Class विमान प्रवास भाडे, (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तीक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शूल्क भरणा पावती, प्रवासाचे मुळ तिकीट, मुळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकीट इ. तपासून विदयार्थ्याच्या बैंक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केली जाईल. विदयार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी USD१५४०० तर युकेसाठी GBP९९०० इतक्या रक्कमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विदयार्थ्यांच्या परदेशातील वैयक्तीक खात्यामध्ये जमा केला जाईल. विद्यार्थ्यास खालील बाबींवर होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यु.एस. ए. व इतर देशांसाठी (यु.के वगळून) १५०० यु. एस. डॉलर आणि यु.के. साठी १,१०० जी.बी.पी इतका निर्वाह भत्ता/ इतर खर्च/आकस्मिक खर्च म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
गडचिरोली दि.1 : प्रत्येक बालक हा सुदृढ व्हावा या उद्दिष्टातून गरोदर व स्तनदा मातांपर्यंत योग्य पोषण आहार पोहचूवन अभिमानास्पद कामगिरी करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना केले.
महिला व बाल विकास विभागाच्या पोषण अभियाअंतर्गत राज्यस्तरीय पोषण माह चे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे व अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे करण्यात आला. जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, उपायुक्त संगिता लोंढे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीतून सुदृढ नवीन पिढी घडविण्यात महत्वाचा वाटा अंगणवाडी सेविकांचा माध्यमातून होत आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बाराही महिने नियमितपणे चांगले काम करत असल्याचे सांगतांना कोविड कालावधीत केलेले काम आणि मुख्यमंत्री योजनेत सर्वाधिक अर्ज नोंदणी केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे निरंतर सुरू राहणार असून त्याला कोणतीही मुदत ठरवून दिलेली नाही. अर्ज भरण्यासाठीचा देय भत्ता ऑक्टोबर महिण्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांचा सन्मान व्हावा म्हणून बालकाच्या नावापुढे प्रथम त्याच्या आईचं नाव मग वडिलांचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय मे-2024 मध्ये देशात सर्वप्रथम महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुपोषणमुक्तीसाठी चांगले उपक्रम राबवित असल्याबद्दल त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे विशेष अभिनंदन केले. पोषण माहांमध्ये पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा नंबर आणावा यासाठी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने नावीन्यपूर्ण काम करण्याचे त्यांनी सांगितले. दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना खनिकर्म निधीतून सायकल मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी महिलांना सक्षम करणे ही शासनाची भूमिका असून यासाठी विविध क्रांतीकारक योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, अन्नपूर्णा योजना, महिलांना मोफत उच्च शिक्षण आदि योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वच्छ आहार आरोग्यासाठी महत्व आणि फोर्टीफाईड फुड योजनेबाबत त्यांनी माहिती दिली.
आयुक्त कैलास पगारे यांनीही सुपोषीत बालक संकल्पनेवर शासनाच्या योजनांची माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून पोषण आहार योजना व कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी विविध योजनेंतर्गत लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.
*नवेगाव अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन*
मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नवेगाव अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. इतकी सुसज्ज इमारत राज्यात प्रथमच पाहत असल्याचे सांगून त्यांनी अंगणवाडी इमारतीचे कौतुक केले.
गडचिरोली/ 30:- शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 673 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी जहाल माओवादी नामे 1) केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम, एरिया कमिटी सदस्य, टेकनिकल टीम- वेस्ट सब झोनल ब्युरो, वय 42 वर्ष, रा. कोसमी नं. - 1 ता. धानोरा, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती
1) केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम
दलममधील कार्यकाळ
. सन 2002 ते 2007 पर्यंत टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर कार्यरत.
. 2007 ते 2012 टेकनिकल टिम नॉर्थ गडचिरोली डिव्हीजन मध्ये कार्यरत.
. 2012 ते 2020 पर्यंत प्लाटुन 15 (टिपागड एरिया) येथे कार्यरत.
. 2020 मध्ये एरिया कमिटी सदस्य पदावर बढती झाली तेव्हापासुन आतापर्यंत
टेकनिकल टिम-वेस्ट सब झोनल ब्युरो येथे कार्यरत.
कार्यकाळात केलेले गुन्हे
चकमक- 18
. सन-2004 मध्ये मौजा मानेवारा व मौजा बंदुर अशा दोन जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन -2014 मध्ये मौजा बोटेझरी जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये सहभाग होता
. सन -2016 मध्ये मौजा दराची जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन-2019 मध्ये मौजा गांगीन जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन-2020 मध्ये मौजा किसनेली जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
. सन-2021 मध्ये मौजा कोडुर (माड एरीया) (छ. ग.)जंगल परिसरात पोलीस दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.
जाळपोळ -02, खुन:-08, ईतर-06 एकुण-34
आत्मसमर्पीत होण्याची कारणे.
गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे.
दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी तो पैसा कधीच वापरल्या जात नाही.
दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.
गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.
शासनाने जाहिर केलेले बक्षिस.
महाराष्ट्र शासनाने केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याचेवर 06 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 25 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. जसवीर ंिसंग, कमांण्डट 113 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विश्वंभर कराळे, प्रभारी अधिकारी पोमके सावरगाव यांनी ही कामगिरी पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.
Gadchiroli News: जुलै 2024 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीसाठी रणजीत सर मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आणि विहान फाऊंडेशन संचलित स्वराज व वीरांगना अकादमीने 450 उमेदवारांना मोफत शारीरिक शिक्षण व शिकवणी दिली. या विशेष योजनेचा लाभ घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींनी पोलीस भरतीमध्ये उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे.
या शिक्षण व प्रशिक्षणामुळे 150 पेक्षा जास्त उमेदवारांची महाराष्ट्र पोलिसांत निवड झाली आहे. त्यांच्या यशस्वीतेचा उत्सव 18 ऑगस्ट 2024 रोजी सेमना हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गडचिरोली नगरपरिषदेचे माननीय मुख्याधिकारी सूर्यकांत पिंडुरकर, चेअरमन कबीर यशोदा धर्माजी निकुरे, रणजीत सर, आकाश संगनवार, दिनेश देशमुख, मेनीराम सर आणि विविध प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
विहान बहुउद्देशीय संस्था गरीब, सुशिक्षित, बेरोजगार आणि गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी विविध योजना राबवत आहे. संस्थेच्या पहिल्या टप्प्यात पोलीस भरतीसाठी 450 मुला-मुलींना मोफत शिक्षण दिले गेले. याचा परिणाम म्हणून 150+ नवीन महाराष्ट्र पोलिसांची निवड झाली आहे.
हे यश गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी केलेल्या कठोर परिश्रमांचे आणि विहान बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नांचे प्रमाण आहे. यामुळे स्थानिक युवक-युवतींना उत्तम संधी मिळाल्या आहेत आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक आदर्श उदाहरण स्थापन झाले आहे.
कोंबडा बाजारावर छापा; १५.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुलचेरा: तालुक्याच्या मुत्परतली जंगल का रसरात अवैधरीत्या कोंबड्यांच्या झुंजी व पैजा लावल्या जात असल्याची माहिती मुलचेरा पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी २५ ऑगस्ट रोजी धाड टाकून १५.९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी २२ जणांना ताब्यात घेण्यात आले.
आपापल्ली नाल्याच्या जंगल परिसरात अवैधरीत्या कोंबडा बाजार भरवून झुंजी लावत असल्याच्या माहितीवरून २५ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता कारवाई करण्यात आली. सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत ही कार्यवाही चालली. पोलिसांनी कोंबडा बाजारातून १५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ३० मोटारसायकली, ४५ हजार रुपयेकिमतीचे १३ मोबाइल, १४ हजार ७५० रुपयांची रोकड, १ हजार ९५० रुपयांचे ५ नग झुंजीचे कोंबडे, लोखंडी धारदार व टोकदार तात्या २० नग, याची किंमत १ हजार रुपये आहे. ५०० रुपये किमतीचा मोजमाप काटा, असा एकूण १५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सात आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एकूण २२ आरोपींपैकी ७ आरोपी हे किरकोळ संघटित टोळ्या करून सट्टा, जुगार चालवितात. तसेच त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची आहे. म्हणून आरोपीविरोधात आरोपीविरोधात कलम ११२ त्या भा. न्या. सं. २०२३, सहकलम १२ (अ) म.जु.का. अन्वये गुन्हा नोंद केला.
गडचिरोली/ दि.26: आपल्या आजुबाजुला बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत मदत कुठुन मिळवून देता येईल, याकरिता कोठे संपर्क करावा, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. अशा संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीकरीता भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत/ संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईनसेवा 1098 संपुर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. ही हेल्पलाईन सेवा दररोज २४ तास उपलब्ध आहे. सदर सेवेचा लाभ बालक स्वत: घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर दूरध्वनीद्वारे गरजू बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाद्वारे करण्यात आले आहे.
मजुरांच्या स्थलांतरावर नियंत्रण
१०९ अमृत सरोवर पुनरूज्जीवीत
गडचिरोली दि. २४ : जिल्ह्यात चालु आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत आतापर्यंत २५ लक्ष ५२ हजार मनुष्यदिवस रोजगार निर्मिती झाली आहे. वित्तीय वर्ष 2024 - 2025 साठी 1 लक्ष 32 हजार नोंदणीकृत मजुरांकरिता 28 लक्ष14 हजार मनुष्यदिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यातुलनेत ९०.६९ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांच्या स्थलांतरावरही नियंत्रण आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली आहे.
रोजगार हमी योजनेतून 70 कोटी 92 लक्ष 51 हजार रुपये मजुरीचे वाटप बँक व पोष्टखात्यातून करण्यात आले आहे.एकूण रोजगार निर्मितीतून 8.96 टक्के अनुसुचित जमाती आणी 37.01टक्के अनुसुचित जाती प्रवर्गाकरीता मनुष्यदिन निर्मीती झालेली आहे तर महीलांकरीता 48.60 टक्के मनुष्यदिन निर्मीती झालेली आहे. एकूण झालेल्या कामांपैकी 30.62 टक्के इतका खर्च कृषि व कृषि आधारीत कामावर करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीचे स्वरुप पाहता आगामी कालावधीत महाराष्ट्र गा्रमीण रोजगार हमी योजनेवर मजुरांचे येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे गृहित धरुन त्यानुसार वार्षीक नियोजन करण्यात आलेले आहे. अकुशल हातांना कामे देण्याबरोबरच कायम स्वरुपी मत्ता निर्मीतीचे देखील लक्ष ठेवण्यात आलेले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त 75 अमृत सरोवर निर्मीतीचे उद्दिष्ट जिल्ह्यास दिलेले होते. गडचिरोली जिल्ह्याने 109 अमृत सरोवर पुनरुज्जिवनाचे काम पुर्ण केलेले आहे. जिल्ह्याने पुर्ण झालेल्या अमृत सरोवर स्थळी 1 मे, 2024 व 15 ऑगष्ट, 2024 रोजी विविध कार्यक्रम राबविण्यासह ध्वजारोहण करण्यात आले. 21 जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस सुध्दा अमृत सरोवरांवर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक अमृत सरोवर टिकाऊ व दिर्घकालीन संपत्ती निर्मीतीचे मानाचे प्रतिक मानल्या जाईल. प्रत्येक अमृत सरोवर हे परीपक्व व अनंतकाळ टिकणारे असल्यामुळे भविष्यात पाणी सिंचन, मत्स्यपालन, जलपर्यटन आणि इतर कामांसाठी वापरुन उदर निर्वाहाचे साधन असेल त्या परीसरातील सामाजिक सम्मेलन बिंदू म्हणुनही आदर्शाचे ठिकाण असेल.
जिल्ह्यात "मेरी मिट्टी मेरा देश" उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त देशी झाडांची लागवड करण्यासह शिलाफलक तयार करुन पंचप्रण शपथ घेण्यात आली. "एक पेड माँ के नाम" अभियान सुध्दा जिल्ह्यात जनसहभागातून यशस्वीरित्या राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी दैने यांनी कळविले आहे.